(संग्रहित) 
मुंबई

फक्त 'खिचडी’ की युतीच्या चर्चा? मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अलीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असताना शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत आणि राज ठाकरे यांची आज सकाळी भेट झाली. या भेटीनंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट युतीच्या चर्चांना उधाण आले.

नेहा जाधव - तांबे

मुंबई : अलीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असताना शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत आणि राज ठाकरे यांची आज सकाळी भेट झाली. या भेटीनंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट युतीच्या चर्चांना उधाण आले. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असल्याने ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही चर्चा पूर्णतः अराजकीय असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

राजकीय खिचडी नव्हे, तर फक्त खिचडी खाल्ली -

उदय सामंत म्हणाले, "मी राज ठाकरे यांची फक्त सौजन्य भेट घेतली. आम्ही चहा घेतला, खिचडी खाल्ली आणि काही अराजकीय गप्पा मारल्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय खिचडी नव्हे, तर फक्त खिचडी खाल्ली."

राजकारणापलीकडेही नाती असतात -

"राजकारणापलीकडेही नाती असतात. मी या परिसरातून जात होतो म्हणून राजसाहेबांना भेटलो. त्यांनी चहासाठी बोलावलं आणि आम्ही नाश्ता केला. भेटीत राजकीय चर्चा झाली असती तर मी ती जाहीरपणे सांगितली असती," असे सामंत यांनी माध्यमांना सांगितले. "ही माझी राज ठाकरे यांच्यासोबत चौथी भेट आहे. प्रत्येक भेटीला राजकीय अर्थ लावणं चुकीचं आहे. उद्या रस्त्यावर संदीपजी भेटले तरी चर्चा होईल की आम्ही युतीसाठी भेटलो. याला काही अर्थ नाही. काही भेटी अराजकीय असतात हे मान्य करायला हवं," असे ते म्हणाले.

आता मी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार -

शेवटी सामंत यांनी मिश्किल टिप्पणी करत सांगितले की, "आता मी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मी राज ठाकरेंचा निरोप घेऊन जातोय! जेव्हा मी राजकीय निरोप घेऊन जाईन, तेव्हा मी आणि संदीपजी मोठी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती देऊ."

दरम्यान, यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान दादर आणि वरळी मतदारसंघात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांमध्ये उमेदवारीच्या बाबतीत विसंवाद दिसून आला होता. विशेषतः वरळी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्याकडून अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का बसला. हि चूक महानगरपालिकेच्या बाबतीत होऊ नये यासाठी ही भेट आहे का? असा सवाल उपस्थित होत होता.

प्रशासनात फेरबदलाचे वारे! गृहनिर्माण, जलसंपदा विभागांना मिळणार नवे सचिव

मुंबई महापालिकेच्या 'त्या' विधी अधिकाऱ्यांना दिलासा; नियुक्तीच्या तारखेपासून ‘नियमित कर्मचारी’ मानण्याचा HC चा आदेश

Mumbai : वाढदिवसाच्या मेजवानीत एसी बंद; ग्राहक आयोगाचा रेस्टॉरंटला दंड

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक व्यापार करार; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश, १५ वर्षांत २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Mumbai : बलात्कारप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्ताला अटक; लग्न झाल्याची बाब पीडितेपासून लपवली