उर्वी महाजनी/मुंबई
मेट्रो-३ प्रकल्पासाठी कापण्यात आलेल्या २५७ झाडांपैकी ११९ झाडांचे पुर्नरोपण करण्याचा प्रस्ताव मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) दिला आहे. मुंबई मेट्रो-३ च्या वृक्ष समितीत हायकोर्टाचे न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे व न्या. सारंग कोतवाल यांचा समावेश आहे. या न्यायाधीशांसमोर हा प्रस्ताव मांडण्यात आला. झाडांने पुर्नरोपण करून त्यांना जिओटॅग लावायला ४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर झाडे जगण्याचा दर ३५ टक्के आहे.
‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी ५ हजार झाडे पाडली होती. यामुळे होणारे पर्यावरण नुकसान पाहता नीना वर्मा, परवीन जहागीर, झोरू बाथेना यांच्या याचिकेवर एक समिती बनवली होती. ही समिती ‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात झाडांच्या पुर्नरोपणावर लक्ष ठेवणार होती. याबाबत काही चुकीचे घडल्याचे दिसताच ते न्यायालयासमोर मांडले जाणार होते.
मेट्रो स्टेशनला भेट दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य कायदा सेवा प्राधिकरणाने हा अहवाल बनवला. यात एमएमआरसीएलचे कर्मचारी व याचिकादारही होते. या पथकाने सर्व मेट्रो स्थानकांना भेट देऊन झाडांची स्थिती पाहिली तसेच झाडे लावण्यासाठी जागांची पाहणी केली.
एमएमआरसीएलने ग्रँट रोड स्टेशन येथे ५१ ऐवजी २१ झाडे, सांताक्रुझ स्टेशन येथे ९६ ऐवजी ४२, एमआयडीसी स्थानकावर १९ ऐवजी १५, गिरगाव स्थानकावर १९ ऐवजी १५ झाडे लावली. सीप्झ रेल्वे स्थानकात १११ ऐवजी २४ झाडे लावली. दादर येथे मात्र, २२ पैकी २२ झाडे लावली. मेट्रोने वृक्षरोपण नकाशानुसार एकही झाड लावले नाही. तर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांधकाम पूर्ण झालेले नाही. झाडे लावण्याचे काम सुरू झालेले नाही. हे काम पूर्ण व्हायला सहा महिने लागतील.
ग्रँट रोड मेट्रो स्थानकाच्या बांधणीपूर्वी दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर झाडे होती. आता मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला झाडांचे पुनर्रोपण केले जाणार नाही. कारण झाडे लावायला फुटपाथच्या बाजूला जागाच नाही, असे अहवालात म्हटले आहे.