अवधूत खराडे/मुंबई
चेंबूरच्या सुभाष नगर येथील बांधकामस्थळी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी चेंबूर पोलिसांनी सिव्हील कंत्राटदार, साइट इंजिनिअर, सुपरवायझर आणि लेबर कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निष्काळजीपणामुळे मानवी जीव धोक्यात घातल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी सुभाष नगरमधील ‘आदित्यराज स्प्रिंग्ज’ या पुनर्विकास प्रकल्पात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी जी+१६ मजली निवासी इमारतीचे बांधकाम सुरू असताना सकाळी सुमारे १० वाजता सर्व सहा कामगार अचानक खाली कोसळले. आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील रहिवासी रमणजेनल्लू देशपोगू (५५) हे थेट जमिनीवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार कामगारही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात बांधकामस्थळी सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईतील पुनर्विकास आणि उंच इमारतींच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये सुरक्षाविषयक नियमांचे पालन कितपत केले जाते, याबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.