Mumbai : गोरेगाव-ओशिवरा प्रवास होणार जलद; बहुप्रतिक्षित मृणालताई गोरे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला, महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन 
मुंबई

Mumbai : गोरेगाव-ओशिवरा प्रवास होणार जलद; बहुप्रतिक्षित मृणालताई गोरे उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला, महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन

७५० मीटर लांबीच्या आणि चार मार्गिकांच्या या उड्डाणपुलामुळे राम मंदिर आणि गोरेगावदरम्यान थेट जोडणी निर्माण झाली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. बहुप्रतिक्षित विस्तारित मृणालताई गोरे उड्डाणपुलाचे शनिवारी (दि.६) मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे गोरेगाव, ओशिवरा आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

७५० मीटर लांबीच्या आणि चार मार्गिकांच्या या उड्डाणपुलामुळे राम मंदिर आणि गोरेगावदरम्यान थेट जोडणी निर्माण झाली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरांतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एका मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

WEH आणि SV रोडला थेट जोडणी

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) आणि स्वामी विवेकानंद मार्ग (SV Road) यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया

उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर रितू तावडे यांनी हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झालेल्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे म्हटले. तसेच, शहराच्या वेगवान प्रगतीचे हे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, "मुंबईचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून आज गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्ताराचे उद्घाटन करण्यात आले. हा उड्डाणपूल WEH आणि SV रोड यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.”

उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्याला आमदार विद्या ठाकूर, आमदार हारून खान, आमदार अमित साटम, उपमहापौर संजय घाडी, भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्पाला अनेक अडथळ्यांचा सामना

मूळ नियोजनानुसार हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेला अडथळा आणि बांधकामादरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाला मोठा विलंब झाला.

वाढत्या खर्चावरून टीका

प्रकल्पाचा वाढता खर्च आणि वारंवार होणारा विलंब यावरून प्रशासनावर टीकाही करण्यात आली होती. खर्चवाढीच्या तिसऱ्या प्रस्तावावर स्थायी समिती सदस्यांनीही प्रश्न उपस्थित केले होते.

विलंबामुळे कंत्राटदारावर दंड

सुधारित मुदतीतही काम पूर्ण न झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली होती. १ मेपासून दररोज २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यानंतरही विलंब कायम राहिल्याने १२ मेपासून दंडाची रक्कम वाढवून प्रतिदिन १ लाख रुपये करण्यात आली होती.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये