वसई : विरार (पश्चिम) येथील ग्लोबल सिटी परिसरात रविवारी ‘वचनपूर्ती जल उत्सव’ कार्यक्रमादरम्यान राडा झाला. भारतीय जनता पक्ष (भाजप), बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि स्थानिक नागरिक यांच्यात रस्ता बंद केल्याच्या कारणावरून मोठा तणाव निर्माण झाला.
रस्ता अडवल्यामुळे तणाव
गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल सिटी परिसरात पाणीटंचाईची गंभीर समस्या होती. अलीकडेच महानगरपालिकेकडून वाढीव जलपुरवठा सुरू झाल्याने परिसरातील पाणीस्थिती सुधारली. या पार्श्वभूमीवर ‘वचनपूर्ती जल उत्सव’ (Promise Fulfilled Water Festival) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपचे आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे-पंडित आणि राजेंद्र गावित यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
मात्र कार्यक्रम रस्त्यावरच आयोजित केल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रस्ता अडवल्याचा निषेध केला, ज्यामुळे त्यांचा आयोजकांशी जोरदार वाद झाला. यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले आणि नागरिकांच्या अडचणीबद्दल संताप व्यक्त केला. अखेर बविआच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
महिला यूट्यूबरवर हल्ल्याचा आरोप
त्यातच कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाल्याचा आरोप एका महिला युट्यूबर पत्रकाराने केला आणि परिस्थिती आणखी चिघळली. तिने विरार येथील बोळींज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीने ‘जय श्री राम’चा घोष करीत असभ्य वर्तन आणि धक्काबुक्की केल्याचे नमूद केले आहे. या घटनेनंतर बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत, म्हणजे पहाटे ३ वाजेपर्यंत, बोळींज पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले.
तपास सुरू
महिला यूट्यूबरच्या तक्रारीवरून बोळींज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात राजकीय तणाव वाढला असून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पोलिसांकडून रस्ता अडवणे आणि कथित हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.