मुंबई : तिकीट दलालांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारवाईत तब्बल १,६७६ तिकीट दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर कोट्यवधी रुपयांची ई-तिकिटे जेसीआर जप्त करण्यात आले आहेत.
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई येथील रेल्वे सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२२ ते जून २०२६ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये ३०९, २०२३ मध्ये ३९९, २०२४ मध्ये सर्वाधिक ५०२, २०२५ मध्ये ३५६ आणि जून २०२६ पर्यंत ११० गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईत ८८,४९,२९९.५५ किमतीची जेसीआर तिकिटे तसेच ९,६२,०१,६५३.०२ किमतीची ई-तिकिटे जप्त करण्यात आली.
आरटीआयच्या उत्तरानुसार, अवैध तिकीट बुकिंग व दलालीप्रकरणी २०२२ मध्ये ३१८ टाऊट व ५२ एजंट, २०२३ मध्ये ३५६ टाऊट व १४१ एजंट, २०२४ मध्ये ४११ टाऊट व २०४ एजंट, २०२५ मध्ये ४२९ टाऊट व १३ एजंट, तर जुलै २०२६ पर्यंत १२७ टाऊट अटक करण्यात आले. २०२६ मध्ये आतापर्यंत कोणत्याही एजंटला अटक झालेली नाही.
या माहितीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, या कालावधीत काही रेल्वे कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. २०२२ मध्ये एका, २०२३ मध्ये दोन आणि २०२४ मध्ये चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र २०२५ आणि २०२६ मध्ये कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याला अटक झालेली नाही.
प्राप्त माहितीवरून रेल्वे तिकिटांच्या अवैध दलालीविरोधात आरपीएफ सातत्याने प्रभावी कारवाई करत असल्याचे स्पष्ट होते. प्रवाशांनी तिकिटे केवळ अधिकृत माध्यमांतूनच खरेदी करावीत आणि दलालांकडून तिकिटे घेणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.