पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता कंत्राटी पद्धतीवर ८०० शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांच्या अधिकारात थेट मुलाखत घेत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली. ८०० शिक्षकांची भरती होणार असल्याने अन्य शिक्षकांच्या कामावरील ताण कमी होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिकेच्या १,१८० शाळा असून १० हजार शिक्षक आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या संख्येत एक लाखाने वाढ झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या चार लाखांवर गेली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने शिक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याने ८०० शिक्षकांची कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात येणार आहे. या जागा भरण्याचे अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे. त्यामुळे त्या-त्या विभागात शाळांच्या नोटीस बोर्डवर शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आवाहन केले जात आहे. सोमवारपासून याची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शिक्षकांना थेट मुलाखतीद्वारे तत्काळ नियुक्ती केली जाणार आहे.