मुंबई : शिवसेना भवन ते वीर सावरकर मार्गावरील सिग्नलपर्यंत तरुणाईची गर्दी, हाती तिरंगा घेतलेले तरुण-आबालवृद्ध, विविध आशयाचे बॅनर हाती घेतलेल्या तरुणांनी या आनंदोत्सवाला तुफान गर्दी केली. या गर्दीने रविवारीही शिवाजी पार्क मैदान परिसरात तरुणाईचा जनसागर लोटला. ‘रंग दे बसंती’, ‘वंदे मातरम’ या गाण्यांवर थिरकताना तरुण ‘वंदे मातरम’चे नारेही देत होते.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकराेच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्क परिसरात ‘विजयी जल्लोषा’चे आयोजन केले होते. यापूर्वी शिवसेना मनसेने शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र त्याआधीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याने मोर्चाचे रूपांतर विजयी जल्लोषात झाले.
आजच्या आनंदोत्सवात महाविद्यालयीन तरुणांसोबत जेष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी तरुण आणि ज्येष्ठ नागरिक भाजप सरकारच्या कारभारावर जोरदारपणे प्रहार करत होती. विजयी जल्लोष करणारे तरुण हाती डॉ. आंबेडकर, भगतसिंग, महात्मा गांधी यांच्या प्रतिमा घेऊन आले होते. काही तरुण संघटनांकडून सरकारच्या कारभारावर उपहासात्मक टीका करणारे संदेश देणारे बॅनर घेऊन आले होते. तरुणांच्या हाती असलेले क्रिएटिव्ह बॅनर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
शिवाजी पार्क मैदानाकडे जाण्यासाठी सकाळी १० वाजल्या आधापीसूनच तरुणाईचे जथ्थे, तर काही तरुण चार-पाच जणांच्या टोळक्याने जाताना सरकारविरोधी घोषणाबाजी करत होते. मोठ्या संख्येने तरुण या आंदोलनात सहभागी झाल्याने शिवसेना भवन तसेच वीर सावरकर मार्गावरील सिग्नलपर्यंत तरुणांची दाटीवाटी झाली होती. विविध आशयाची गाणी गात तरुण सरकारवर टीका करत होते. कॉकराेच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या छायाचित्रासह ‘झुकती हे दुनिया, झुकानेवाला चाहिए’, ‘विद्यार्थ्यांचा संघर्ष, देशाचा संघर्ष’ यांसह अनेक कल्पक फलकांतून तरुणांनी सरकारच्या विरोधातील रागाला वाट मोकळी करून दिली .
तसेच ‘रंग दे बसंती’, ‘वंदे मातरम’ या गाण्यांवर थिरकत तरुण सरकारवर टीका करत होते. तसेच ‘वंदे मातरम’चे नारे देत होते. प्रत्येकाच्या हातात तिरंगा तसेच सरकारविरोधात संताप व्यक्त करणारे फलक होते. या विजयोत्सवात तरुणांची क्रिएटिव्हिटीही दिसून आली. यावेळी तरुणांनी आणलेल्या वेगवेगळ्या पोस्टर्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
विविध पोस्टर्सनी वेधले लक्ष
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी आमच्या सरकारमध्ये राजीनामा होत नसल्याच्या विधानावर तरुणाईने मिम्स बनवले होते. ‘सर पॉलिसी अपडेच झाली आहे,’ अशा आशयाचे पोस्टर तरुणांनी हाती घेतलेले होते. ज्या तरुणाईला सरन्यायाधीश झुरळ म्हणाले होते, त्याच झुरळांचा फोटो लावत हे आंदोलन ‘HIT आहे बॉस’ असाही पोस्टर तरुणाईने झळकावला. ‘मोठे मोठे गार केले गंमतमधी’ अशा बॅनरद्वारे तरुणाईने सरकारवरच प्रहार केला. एका पोस्टरमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेबाच्या रूपात दाखवून त्यावर ‘बादशहा ए तबाही’ असे लिहिले होते, तर आणखी एका पोस्टरमध्ये ‘पुढचा नंबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा’ असल्याचा इशारा क्रिएटिव्हिटीतून तरुणाईने सरकारवर साधला.