वसई–विरार : पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून एकाने जीव गमावल्याची धक्कादायक घटना विरारमधून उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ११:३० वाजता विरार येथील जेपी नगर परिसरात घडली. अर्नाळा सागरी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश पवार (५७) हे विरार पश्चिमेतील जेपी नगरमधील इमारत क्रमांक १५ मध्ये राहत होते. त्यांच्या समोर राहणारी कुंदा तुपेकर (४६) हिच्यासोबत पाणी वापर आणि पाणी भरण्यावरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. मंगळवारी पाणी भरण्यासाठीच्या रांगेत दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर रात्री पुन्हा वाद चिघळला.
यावेळी रागाच्या भरात कुंदाने उमेश पवार यांच्या चेहऱ्यावर थेट डास मारण्यासाठीचा ‘मॉस्किटो किलर स्प्रे’ फवारला. त्यामुळे ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
“या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून आरोपी कुंदा तुपेकर हिला अटक करण्यात आली आहे,” अशी माहिती अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांनी दिली.