मुंबई : पवई येथील फिल्टरपाडा परिसरातील बंगूर दागावजवळ गुरुवारी दुपारी विहार तलावात १९ वर्षीय तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. कैलास सोमण (१९) असे या तरुणाचे नाव आहे. ही दुर्घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाला गुरुवारी दुपारी ३.१८ वाजताच्या सुमारास एक तरुण तलावात बुडाल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास तलावाच्या पात्रात उतरला होता आणि अचानक पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पवई पोलीस आणि पालिकेच्या प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाकडून तलावात तरुणाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. मृतदेह हाती आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाईल. तसेच तो तलावावर का गेला होता आणि घटना नेमकी कशी घडली, याचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.