नवी दिल्ली : केंद्र सरकारने ई-२० इंधन धोरणावर पुनर्विचार करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केली. ई-२० मुळे वाहनांचे नुकसान होत आहे, मायलेज कमी मिळत आहे आणि जनतेला गैरसोय होत आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच, अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे की, हे प्रकरण चिघळण्यापूर्वी सरकारने पुढाकार घेऊन ते सोडवावे. दरम्यान, आम आदमी पक्षाने येत्या शनिवारी ई-२० विरोधात 'नॅशनल टाऊन हॉल' ची घोषणा केली असून यामध्ये तज्ज्ञ, बाधित वाहन मालक आणि सामान्य नागरिक एकत्र येणार आहेत.
सरकारने ई-२०0 च्या मुद्द्यावर लोकांच्या चिंता ऐकून घेतल्या पाहिजेत. ई-२० मिश्रित इंधनामुळे त्यांच्या वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याची आणि मायलेज कमी होत असल्याची तक्रार मोठ्या संख्येने लोक करत आहेत, असे केजरीवाल म्हणाले. येत्या शनिवारी 1 ऑगस्टला दुपारी १२ वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ई-२० विरोधात 'नॅशनल टाऊन हॉल' आयोजित केला जाईल. दिल्ली आणि परिसरातील लोक थेट सहभागी होऊ शकतील, तर देशभरातील लोक ऑनलाइन सामील होऊ शकतील. तसेच एक व्हॉट्सॲप क्रमांक (+९१ ८५८८८ ३३२१२) जारी करण्यात आला आहे. त्यावर मेसेज पाठवल्यानंतर सहभागींना कार्यक्रमाची ऑनलाइन लिंक दिली जाईल.