राष्ट्रीय

दीपक केसरकर यांनी मांडली बंडखोर गटाची भूमिका म्हणाले बाळासाहेबांचा विचार...

आमच्या आमदारांमध्ये वेळोवेळी फूट पाडण्याचा प्रयत्न निर्माण केला गेला. आजही तसेच चालू आहे.

वृत्तसंस्था

काल आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला आणि काल मीडियासमोर एक चित्र उभे केले गेले की सेलिब्रेशन झाले आहे. पण हे चुकीचे आहे. असे कोणतेही सेलिब्रेशन झाले नाही. उद्धव ठाकरे अजूनही आमचे नेते आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर लढताना आमच्या नेत्याशीही आम्हाला लढावे लागले, याचे आम्हालाही दु:ख आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आजही आदर आहे, अशी भूमिका बंडखोर गटाचे नेते दीपक केसरकर यांनी गुरुवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

आमच्या आमदारांमध्ये वेळोवेळी फूट पाडण्याचा प्रयत्न निर्माण केला गेला. आजही तसेच चालू आहे. काही लोक मुद्दाम बातम्या देत आहेत. मंत्रिपदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आजच शिंदेसाहेब मुंबईला रवाना झाले आहेत. दुसरी गोष्ट भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, यामुळे फडणवीस साहेब काही निर्णय घेतील. त्यामुळे मंत्रिपदाची जी काही यादी दिली जात आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे.

बाळासाहेबांचे विचार

पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न

बाळासाहेबांचा जो विचार होता तो हिंदुत्वाचा विचार होता. तो पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाळासाहेबांशी असलेले संबंध, मातोश्रीशी असलेले संबंध हे लक्षात घेतले असते तर अशी स्टेटमेंट आली नसती. यामुळे संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं होईल. शिंदेसाहेब प्रत्येक आमदाराशी चर्चा करतात, त्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी ठरवतात. यामुळे आमच्या बैठकीत असे ठरले आहे की, जो काही निर्णय घ्यायचाय तो शिंदेसाहेब घेतील. शिवसेना पक्ष नाहीसा करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू होता, त्यामुळे हे घडले. अनेक मतदारसंघांत त्यांच्या दोन नंबरच्या उमेदवाराला बळ देण्याचे काम सुरू होते, असे केसरकर म्हणाले.

पाठीत खंजीर खुपसला तो राऊतांनीच

ते पुढे म्हणाले की, शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिल्यावर तो फिरवणं योग्य नव्हते. ते आनंद दिघेंचे मानसपुत्र आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना निवडून दिले, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असे म्हणणे योग्य नाही. पाठीत खंजीर जर कुणी खुपसला असेल तर संजय राऊतांनी खुपसला. राऊतांनी कमी बोलावे एवढीच आमची माफक इच्छा आहे, असेही केसरकर म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक