नवी दिल्ली : देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेच्या पावित्र्याला धक्का लागला असून त्याबद्दल आम्हाला केंद्र व एनटीएकडून (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) उत्तर हवे आहे, असे सुप्रीम कोर्टाने मंगळवारी खडसावले, तर ‘नीट’ची नव्याने परीक्षा घेण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावतानाच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन थांबवण्यास नकार दिला.
सुप्रीम कोर्टाचे न्या. विक्रम नाथ व न्या. अहसनुद्दीन अमनानुल्लाह यांच्या खंडपीठाने ‘नीट’च्या याचिकांवर सुनावणी केली.
या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत केंद्र सरकार, एनटीए व बिहार सरकारला खंडपीठाने नोटिसा बजावल्या आहेत. शिवांगी मिश्रा व अन्य नऊ ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या.
खंडपीठाने सांगितले की, याप्रकरणी एनटीए व केंद्र सरकारने आपली बाजू मांडावी. तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरूच ठेवावे. तुम्ही युक्तिवाद सुरूच ठेवल्यास तुमची याचिका रद्दबातल करू, असा इशारा न्यायालयाने दिला. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप देशभरातून होत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांना हा पेपर परीक्षेपूर्वीच मिळाला. त्यामुळे ते या परीक्षेत उत्तीर्ण झाले. २३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेतील ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत.