मनीष गोधा/जयपूर
केंद्र सरकारच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाविरुद्ध तीन प्रकारचे ‘पाणीमिश्रित दूध’ सादर करून जयपूर ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांनी अनोखा आणि प्रतिकात्मक निषेध नोंदवला आहे.
एम-० , एम-५० आणि एम-१०० या तीन प्रकारच्या पाणीमिश्रित दुधाच्या सादरीकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ‘जयपूर दुध उत्पादक संघर्ष समिती’ या संघटनेने प्रसिद्ध केला असून, ही संघटना जयपूर ग्रामीण भागातील पशुपालकांचे प्रतिनिधित्व करते.
समितीचे अध्यक्ष रमन यादव म्हणाले की, केंद्र सरकार जसे जनतेला इथेनॉलमिश्रित पेट्रोल विकते, तसेच शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांसाठी प्रतिकात्मक स्वरूपात पाणीमिश्रित दूध (एम-०, एम-५० आणि एम-१००) सादर केले आहे. यामध्ये ‘एम-१००’ हे शुद्ध दूध आहे, ‘एम-५०’ मध्ये ५० टक्के पाणी आहे, तर ‘एम-०’ मध्ये फक्त पाणी आहे आणि दूध अजिबात नाही.
यादव म्हणाले, ‘सरकार ज्याप्रमाणे इंधनातील भेसळ ही अधिकृत धोरण म्हणून मांडत आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनीही दूध आणि पाण्याच्या मिश्रणातून आपला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.’ ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भारतातील लाखो लोक आजही पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांवर अवलंबून आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर, वाहतूक खर्चावर आणि वाहनांच्या देखभालीवर होणाऱ्या परिणामांबाबत शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठी चिंता आहे. हीच नाराजी व्यक्त करण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आर्थिक भार वाढतोय
शेतकऱ्यांनी सांगितले की, एका बाजूला पशूखाद्य आणि चाऱ्याच्या वाढत्या किमतींमुळे पशुपालक त्रस्त आहेत, तर दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चाच्या तुलनेत दुधाचे खरेदी दर वाढत नाहीत. तसेच, राज्य सरकारकडून मिळणारे दुधाचे अनुदानही दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. परिणामी, पशुपालक आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार सातत्याने वाढत आहे.