देवघर : देशात गाजत असलेल्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल झारखंडमध्ये फुटला आहे. बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांना लवकरच बिहारमध्ये नेले जाणार आहे.
बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागातर्फे यंदा ५ मे रोजी ‘नीट-यूजी’ पेपर फुटीचा तपास सुरू आहे. काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाली असून विद्यार्थी उत्तरे पाठ करत आहेत, असे पोलिसांना कळले. पोलिसांनी जळलेली प्रश्नपत्रिका व बुकलेट नंबर ६३६४८८ ताब्यात घेतली. हे बुकलेट हजारीबागच्या एका परीक्षा केंद्रावरील होते. त्यामुळेच झारखंडमधून
‘नीट’चा पेपर फुटल्याचा संशय आहे. नालंदा येथील सरकारी संस्थेतील तांत्रिक सहाय्यक संजीव मुखिया यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पेपरफुटी प्रकरणाचा तो मास्टरमाइंड आहे. हा बीपीएससी शिक्षक पेपर फुटीप्रकरणी तुरुंगात गेला होता. ‘एम्स’ देवघरजवळील एका घरातून त्यांना पकडले. देवघरचे पोलीस अधिकारी रित्विक श्रीवास्तव म्हणाले की, बिहार पोलिसांनी आम्हाला टिप दिली. त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतले. या सर्व संशयितांना बिहारमध्ये नेण्यात आले आहे. परमजीतसिंग ऊर्फ बिट्टू, चिंटू ऊर्फ बलदेव कुमार, काजू ऊर्फ प्रशांत कुमार, अजित कुमार ऊर्फ कारू हे सर्वजण नालंदा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
केंद्राला अहवाल सोपवला
बिहारच्या आर्थिक गुन्हेगारी पोलीस विभागाने ‘नीट’ पेपरफुटीचा अहवाल केंद्र सरकारला सोपवला आहे. आतापर्यंत या प्रकरणी झालेल्या तपासाचा वृत्तांतही केंद्र सरकारला दिला आहे. पाटण्यात छापेमारीनंतर ‘नीट’ची जळालेली प्रश्नपत्रिका, अटक आरोपींची कबुली आदी माहिती केंद्र सरकारला दिली आहे. या अहवालाची छाननी करून परीक्षेबाबत केंद्रीय शिक्षण खाते निर्णय घेऊ शकते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बिहारच्या आर्थिक गुन्हेगारी पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक नय्यर हसनैन खान यांनाही दिल्लीत बोलावले आहे. नय्यर हसनैन खान व शिक्षण खात्याचे ज्येष्ठ अधिकारी ‘नीट’ परीक्षेचा आढावा घेतील.
कथित मास्टरमाइंड रवी अत्रीला अटक
पेपरफुटीप्रकरणी कथित मास्टरमाइंड रवी अत्री याला उत्तर प्रदेश विशेष टास्क फोर्सने अटक केली आहे. अत्री हा ग्रेटर नोएडाच्या नीमका गावचा राहणार आहे.
१५६३ जणांची आज ‘नीट’ची परीक्षा
‘नीट-यूजी’ची पुनर्परीक्षा रविवारी सात केंद्रांवर होणार आहे. यात १५६३ विद्यार्थी सहभागी होतील. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत काही समस्या निर्माण झाल्या होत्या त्यांच्यासाठी ही परीक्षा आयोजित केली आहे. एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.२० दरम्यान होईल. सर्व विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचून निर्देशांचे पालन करायचे आहे.