सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने डिजिटल सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने (DOT) सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना राज्य सरकारद्वारे विकसित करण्यात आलेले सायबर सिक्युरिटी ‘संचार साथी’ हे ॲप प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश सोमवारी (दि.१) दिले. या निर्णयावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली असून आता केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
संचार साथी ॲप नको असेल तर...
दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार, नवीन विकल्या जाणाऱ्या सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ आधीपासून असणे बंधनकारक राहील. जुन्या फोनसाठी सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ॲप अनिवार्यपणे उपलब्ध करून द्यावे लागेल. वापरकर्त्यांना हे ॲप डिलीट किंवा डिसेबल करण्याची परवानगी नसेल, असे सांगण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. त्यावर संचार साथी ॲप नको असेल तर तुम्ही ते डिलीट करू शकता, अशी माहिती ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.
डिलीट करता येईल का?
ते म्हणाले, "हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. आमची जबाबदारी आहे की हे ॲप सर्वांना माहित व्हावे. पण ते फोनमध्ये ठेवणे किंवा न ठेवणे हा निर्णय नागरिकांचाच आहे. हे इतर कोणत्याही ॲपप्रमाणे सहज डिलीट करता येते.”, असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडे मुद्दे नसतात, म्हणून ते...
संचार साथी ॲपवर सुरु असलेल्या वादाबाबत ते म्हणाले, “विरोधकांकडे मुद्दे नसतात, म्हणून ते कुठलेही मुद्दे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर आम्ही काय करणार? आमची जबाबदारी आहे की, ग्राहकांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित करणे. संचार साथी ॲप ग्राहकांना स्वतःची सुरक्षा वाढवण्याची सुविधा देते.”
'संचार साथी'मुळे काय शक्य?
पुढे ते म्हणाले, “संचार साथी पोर्टल २० कोटींपेक्षा अधिक डाउनलोड्स झाले आहेत. १.५ कोटींपेक्षा जास्त ॲप्स डाउनलोड झाले आहेत. या ॲपमुळे जवळपास १.७५ कोटी फसवणूकीची मोबाईल कनेक्शन्स डिस्कनेक्ट करण्यात आली. २० लाख चोरीचे फोन शोधण्यात आले. ७.५ लाख हरवलेले फोन त्यांच्या मालकांकडे परत देण्यात आले. हे सर्व संचार साथीमुळे शक्य झाले.”
पाळत ठेवली जाते का?
सिंधिया म्हणाले, “हे ॲप कोणतीही पाळत ठेवत नाही, कॉल मॉनिटर करत नाही. तुम्हाला हवे असल्यास ॲप अॅक्टिव्हेट किंवा डीअॅक्टिव्हेट करू शकता. हे ग्राहक संरक्षणासाठी आहे. उगाच काही गैरसमज पसरवले जात आहेत.