नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण उष्णता जाणवू लागली असून उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि महाराष्ट्रात पारा ४६°सें. च्या वर नोंदवला गेला. देशात सर्वात जास्त उष्णता उत्तर प्रदेशातील बांदा येथे होती. येथे पारा ४७.६°सें. नोंदवला गेला. खाजगी हवामान संस्था स्कायमेटनुसार, आजपासून २४ मे पर्यंत देशाचा मोठा भाग भीषण उष्णतेने होरपळेल.
या काळात ईशान्य आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग वगळता जवळपास अर्ध्या देशात उष्णतेची लाट राहील.सरासरी तापमान ४५°सें. पर्यंत राहू शकते. याचे कारण म्हणजे ज्या हवामान प्रणालींमुळे यापूर्वी अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत होता, त्या आता कमकुवत झाल्या आहेत. एजन्सीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश
विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकारी, आरोग्य विभाग, वीज विभाग आणि मदत संस्थांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रुग्णवाहिका सेवा सक्रिय ठेवण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरून संवेदनशील जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे, तसेच मदत आणि बचाव कार्याची तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.