घरातील फ्रिजमध्ये ठेवलेली रसमलाई खाल्ल्याच्या कारणावरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट रक्तरंजित हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.९) रात्री उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडली आहे. रसमलाई मुलांमध्ये वाटून स्वतःही खाल्ल्याच्या रागातून धाकट्या भावाने आणि त्याच्या पत्नीने मोठ्या भावावर व वहिनीवर कात्रीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
ही घटना बांगरमऊ कोतवाली हद्दीतील परिसरात घडली. जखमींची ओळख शानू आणि त्यांची पत्नी साबरीन अशी झाली आहे. त्यांच्यावर शानूचा धाकटा भाऊ नूर आणि त्याची पत्नी फातमा यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.
साबरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री त्यांच्या बहिणीने फोन करून फ्रिजमध्ये ठेवलेली रसमलाई मुलांमध्ये वाटण्यास सांगितली होती. त्यानंतर साबरीन यांनी रसमलाई मुलांना दिली आणि स्वतःही खाल्ली.
रसमलाईवरून वाद चिघळला
ही गोष्ट नूर आणि फातमा यांना समजल्यानंतर दोघांनी नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, नूर आणि फातमा यांनी शानू आणि साबरीन यांच्यावर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांना गंभीर दुखापत झाली.
नातेवाईकांनी नेलं रुग्णालयात
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांत तक्रार, तपास सुरू
पीडित कुटुंबाच्या वतीने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. वाद नेमका कसा वाढला आणि हल्ल्यात कोणाचा किती सहभाग होता, याचीही चौकशी केली जात आहे.