नवी दिल्ली : भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे आगामी दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी उत्तर विभागाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेसाठी गिलचा भारतीय संघात समावेश केला जाणार की नाही, याविषयी सध्या संभ्रम आहे.
यंदा २८ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत दुलीप ट्रॉफीचे सामने होतील. या स्पर्धेतील सामने रणजीप्रमाणेच प्रत्येकी चार दिवसांचे असतील. तसेच यूएई येथे ९ सप्टेंबरपासून टी-२० प्रकारातील आशिया चषकाला प्रारंभ होईल. त्यामुळे आशिया चषकात गिलची निवड झाल्यास १ सप्टेंबरपर्यंत त्याला भारतीय संघासह यूएईला रवाना व्हावे लागेल. गेल्या काही काळापासून गिल भारताच्या टी-२० संघातून बाहेर आहे. संजू सॅमसन व अभिषेक शर्मा टी-२० संघात सलामीला येतात, तर तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी फलंदाजी करतो.
२५ वर्षीय गिलच्या नेतृत्वात भारताने नुकताच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. गिलने या मालिकेत ४ शतकांसह तब्बल ७५४ धावा करताना असंख्य विक्रम रचले. त्यामुळे गिल दुलीप ट्रॉफीत खेळणार नसला, तर अंकित कुमार उत्तर विभागाचे नेतृत्व करेल. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज या संघाचा भाग आहेत.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मध्य व ईशान्य असे सहा संघ सहभागी झाले आहेत. २०२४मध्ये दक्षिण व पश्चिम विभागात अंतिम फेरी रंगली होती. त्यामुळे ते थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर उपांत्यपूर्व फेरीत उत्तर विरुद्ध पूर्व विभाग आणि मध्य विरुद्ध ईशान्य विभाग अशा लढती होतील.
उत्तर विभाग संघ
शुभमन गिल (कर्णधार), शुभम खजुरिया, अंकित कुमार, आयुष बदोनी, यश धूल, अंकित कालसी, निशांत सिंधू, साहिल लोतरा, मयांक डागर, युधविर सिंग, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अंशुल कंबोज, आकिब नबी, कन्हैया वाधवन. राखीव : शुभम रोहिल्ला, गुर्नूर ब्रार.