क्रीडा

ऐतिहासिक लॉर्ड्सवर प्रथमच महिलांचा कसोटी सामना; भारत-इंग्लंडमध्ये होणार लढत!

Swapnil S

लंडन : ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय महिला संघाला इंग्लंडविरुद्ध ही लढत खेळण्याचे भाग्य लाभणार आहे. २०२६मध्ये ही लढत होईल, असे इंग्लंड क्रिकेट मंडळाने जाहीर केले.

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर पुरुष संघांचे सर्वप्रकारचे सामने झाले आहेत. मात्र येथे आजवर महिलांचा एकही कसोटी सामना खेळवण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड महिला संघांतील ॲशेस सामनाही लॉर्ड्सवर अद्याप झालेला नाही. मात्र २०२६मध्ये भारत-इंग्लंड महिला संघांत येथे कसोटी होणार आहे. त्यापूर्वी, जून २०२५मध्ये भारतीय महिला संघ ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. तर २०२६मध्ये वर्षाच्या सुरुवातीला उभय संघांत कसोटी खेळवण्यात येईल, असे समजते.

भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत ९ कसोटी सामने खेळले आहेत. जून १९८६मध्ये उभय संघांत पहिली कसोटी झाली, तर २०२१ची ब्रिस्टोल येथील कसोटी अनिर्णित राहिली.

दरम्यान, सध्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषकासाठी तयारी करत आहे. ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिराती येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारताला अद्याप एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.

भारतीय पुरुषांचा पाच कसोटींसाठी इंग्लंड दौरा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघ पुढील वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांत ५ कसोटी सामने खेळवण्यात येतील. २० जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या मालिकेला म्हणजेच २०२५ ते २०२७च्या कार्यकाळाला प्रारंभ करणार आहे. जूनच्या सुरुवातीलाच २०२५च्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये रंगणार आहे. त्यानंतर लगेचच भारत-इंग्लंड मालिका सुरू होईल. ४ ऑगस्टपर्यंत ही मालिका संपेल. पहिल्या व दुसऱ्या कसोटी दरम्यान सात दिवसांची, तर तिसऱ्या व चौथ्या कसोटी दरम्यान आठ दिवसांची विश्रांती असेल.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा