शेकडो झाडे पडल्याने ठाण्यातील हिरवाई धोक्यात; दीड वर्षांत ५६० झाडे कोसळली, विकासकामांवर प्रश्नचिन्ह 
ठाणे

शेकडो झाडे पडल्याने ठाण्यातील हिरवाई धोक्यात; दीड वर्षांत ५६० झाडे कोसळली, विकासकामांवर प्रश्नचिन्ह

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरात गेल्या दीड वर्षांत ५६० झाडे उन्मळून पडली तर ३८९ फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

Swapnil S

ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरात गेल्या दीड वर्षांत ५६० झाडे उन्मळून पडली तर ३८९ फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, पाऊस किंवा वादळी वारे नसतानाही गेल्या पाच महिन्यांत ५५ मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे नागरी विकासकामे, अवैज्ञानिक खोदकामे आणि झाडांच्या मुळांवर होणारा परिणाम याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

एकेकाळी हिरवाईने नटलेले ठाणे आज सिमेंट काँक्रीटच्या जंगलात बदलत चालले आहे. मेट्रो, सिमेंट रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, पदपथ आणि विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. या कामांदरम्यान झाडांच्या मुळांवर घाला पडत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. झाडांची मुळे तुटल्याने त्यांची जमिनीवरील पकड कमकुवत होते आणि थोड्याशा वाऱ्यातही मोठी झाडे कोसळण्याच्या घटना वाढत आहेत.

महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या (२०२६) जानेवारीत ८, फेब्रुवारीत १४, मार्चमध्ये १५, एप्रिलमध्ये १२ तर मे महिन्यात आतापर्यंत ६ झाडे कोसळली आहेत. याशिवाय ३९ ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

दरम्यान, काही ठिकाणी इमारती किंवा व्यावसायिक आस्थापनांसमोर अडथळा ठरणारी झाडे जाणीवपूर्वक सुकवण्यासाठी त्यांच्या मुळांमध्ये ॲॅसिड किंवा रासायनिक इंजेक्शन टाकले जात असल्याचाही आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे या सर्व घटनांची सखोल चौकशी करून वृक्षसंवर्धनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दरवर्षी वृक्षारोपणाच्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात वाढलेली झाडेच कोसळत असतील, तर ठाण्याची उरलेली हिरवाईही धोक्यात आली आहे.

पाऊस नसताना मोठी झाडे उन्मळून पडणे ही अत्यंत गंभीर आणि धोक्याची घंटा आहे. विकासकामांदरम्यान झाडांच्या मुळांवर होणारे खोदकाम, सिमेंटचे वाढते जाळे, अवैज्ञानिक फांदी छाटणी आणि वृक्षसंवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच ठाण्यात गेल्या दीड वर्षांत ५६० झाडे कोसळली आहेत. हे शहरातील बिघडलेल्या पर्यावरणीय व्यवस्थेचे वास्तव चित्र आहे.
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक ठाणे)

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी

वाशीत कौटुंबिक वादातून मुलानेच केली आईची हत्या; आरोपी अटकेत