ठाणे : शिळफाटा परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना शिळ डायघर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तलीचा मोठा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत सात जणांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ५०० किलो गोवंशीय मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी शस्त्रे, मोबाईल, रिक्षा, चारचाकी वाहन तसेच जिवंत जनावरे जप्त करण्यात आली आहेत.
शिळ डायघर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार सचिन कोळी, सहायक पोलीस निरीक्षक राजपूत, पोलिस उपनिरीक्षक शिरसकर आणि अन्य कर्मचारी २४ मेच्या पहाटे बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत होते. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून ठाकुरपाडा, गणेश कंपाऊंड परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने ब्ल्यू मून कंपाऊंडमधील एका पत्र्याच्या गोडाऊनवर छापा टाकला.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता काही नागरिकांनी सात संशयितांना पकडून ठेवले होते. जमावाकडून मारहाण झालेल्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेत वैद्यकीय उपचारासाठी पाठविले. त्यानंतर गोडाऊनची तपासणी केली असता आतमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांचे अवयव आढळले. घटनास्थळी दोन टोकदार लोखंडी टोचे, दोन धारदार सुरे, लाकडी दांड्याची कुऱ्हाड आणि डिजिटल वजन काटा देखील जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान अंदाजे ५०० किलो वजनाचे गोवंशीय मांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच गोडाऊनमध्ये दोन जिवंत बैल बांधलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांची सुटका करून गोशाळेत रवाना केले. याशिवाय घटनास्थळावरून एक दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी कार जप्त करण्यात आले.
रिक्षा व चारचाकी या कारमध्येही गोवंशीय मांसाचे तुकडे आढळून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी हैदरअली कुरेशी, मदार कुरेशी, फिरोज कुरेशी, अरशद कुरेशी, मोहम्मद जफर पठाण, निजाम शेख आणि हारुन उर्फ मुन्ना कुरेशी या सात जणांना अटक केली आहे. यातील काही जणांवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन वसंत कोळी यांच्या तक्रारीनुसार शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
गाेवंश हत्येबाबत राज्य सरकारने यापूर्वीच कठोर भूमिका घेतली आहे. या कायद्याची अंमलबजावणी होण्याची मागणी केली जात आहे.
आर्थिक फायद्यासाठी विक्री
आर्थिक फायद्यासाठी संघटितरीत्या गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक, साठवणूक आणि कत्तल करून मांस विक्री करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. बुधवारी बकरी ईद आहे. त्या पार्श्वभूमीवर गोवंशाची तस्करी होऊ नये म्हणून पोलीसही सतर्क झाले आहेत.