कोल्हापूर / शेखर धोंगडे
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता, संघर्ष आणि जनतेचा कौल यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. एकीकडे महायुतीने अनेक महत्त्वाच्या प्रभागांत विजय मिळवत आपली ताकद दाखवली, तर दुसरीकडे काँग्रेसने शहरात सर्वाधिक जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला. या निकालाने कोल्हापूरच्या राजकारणातील बदलते प्रवाह आणि मतदारांचा स्पष्ट संदेश उमटवला आहे.
८१ जागांच्या या निवडणुकीत काँग्रेसने ३७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महायुतीला कडवी झुंज दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरले, तरीही महायुतीला काँग्रेसच्या आव्हानाचा सामना करावा लागला. सतेज पाटील यांचा ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ या शैलीतील रस्त्यावरचा प्रचार चर्चेचा विषय ठरला.
महायुतीतर्फे भाजपला २४, शिवसेना (शिंदे गट)ला १४ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या. खासदार धनंजय महाडिक यांनी निकालाला जनतेच्या विश्वासाचा कौल मानत, विकासाच्या राजकारणावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला. भाजप कार्यालयात विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकीत हातात हात घालून आपली गल्ली, गाव सांभाळा, परिणाम चांगले दिसतील. आपल्या कामाची नोंद मी स्वतः व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही नक्की घेईल.
लक्षवेधी प्रभाग आणि अपक्ष उमेदवार
प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिंदेसेनेचे उमेदवार ऋतुराज राजेश क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवार विजय साळोखे-सरदार यांचा पराभव केला. विजय साळोखे-सरदार यांनी अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढवत स्वच्छ चारित्र्य, साधेपणा आणि प्रामाणिकपणाचा संदेश दिला. पराभव स्वीकारताना त्यांनी जनतेचे आभार मानले आणि विजय-पराजयापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेना (शिंदे गट)चे शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसला धक्का देत विजय मिळवला. नुकताच पक्षप्रवेश केलेल्या देशमुखांविरोधात काँग्रेसने विशेष तयारी केली होती, मात्र तुल्यबळ आणि रोमांचक लढतीत देशमुखांनी मतदारांचा विश्वास संपादन केला. हा विजय त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरला असून, महायुतीसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.
विजयात सतेज पाटलांचा मोठा हातभार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला काठावरचं बहुमत मिळाले असले, तरी निकालाने शहराच्या राजकारणावर काँग्रेसचे वर्चस्व स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली, आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील लढत ही निवडणुकीची खरी केंद्रबिंदू ठरली. महायुतीविरोधात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आणि कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी थेट मैदानात उतरून प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे तब्बल ३४ उमेदवार विजयी झाले. शिवसेना (ठाकरे गट) ला केवळ एक जागा मिळाल्यामुळे महापालिकेची सत्ता अवघ्या सहा जागांनी काँग्रेसच्या हातून निसटली, तरीही काँग्रेस हा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, ज्यामुळे शहरातील राजकीय समीकरणात मोठा बदल दिसून येतो.
महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय, प्रत्येक कोल्हापूरकरांचा विश्वास दर्शवतो. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून, जनतेने खऱ्या अर्थाने ‘विकासाच्या’ राजकारणावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपच्या कार्यालयात विजयी उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.हा विजय प्रत्येक कोल्हापूरकरांच्या विश्वासाचा आहे. जनतेने नकारात्मकतेला नाकारून प्रगतीला पाठिंबा दिला आहे. प्रचारादरम्यान जाहीरनाम्यामध्ये कोल्हापूरच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दिलेला शब्द महायुती पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांनी यशाच्या आनंदात सहभागी होऊन भावनिक क्षण साजरे केले. विजयी उमेदवारांनी नागरिकांच्या हितासाठी कार्य करण्याचे वचन दिले असून, शहराच्या प्रगतीसाठी प्रयत्न सतत सुरू राहतील.खा. धनंजय महाडिक
गेल्या ५ वर्षांत शहरात महायुतीच्या माध्यमातून विकासाचे वारे वाहत असून, हे मतदारांनी देखील मान्य केले आहे.कोल्हापूरकरांनी फक्त सत्तांतर केले नाही, तर भविष्यातील आधुनिक आणि सुसज्ज कोल्हापूरच्या संकल्पनेवर आपला विश्वास दाखविला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि करण्यात आलेली विकासकामे यामुळे जनतेने महायुतीला संपूर्ण साथ दिली. शिवसेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संधी मिळाली असून, कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीचे सर्व नगरसेवक कटिबद्ध राहतील. महायुतीला सत्तेपर्यंत पोहचविल्याबद्दल आणि सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल शहरवासियांचे मनःपूर्वक आभार मानतो.आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल. उमेदवारी न मिळाल्याने कोणीही नाराज होऊ नये; इच्छुक असूनही थांबावे लागणाऱ्यांचा बॅकलॉग आपण भरून काढू. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे, गाफील राहू नये; अन्यथा पश्चाताप करावा लागेल. मंत्री असल्यामुळे माझ्या मतदारसंघात काहीही घडल्यास त्याचा परिणाम मुंबईतील वरिष्ठ पातळीवर होतो. येणाऱ्या निवडणुकीत हातात हात घालून आपली गल्ली, गाव सांभाळा; परिणाम चांगले दिसतील. आपल्या कामाची नोंद मी स्वतः व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही नक्की घेईल.हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री