मुंबई : महाराष्ट्रात सध्या हवामानाचा मोठा लपंडाव सुरू असल्याचे चित्र आहे. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली, तरी अनेक जिल्हे अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बुधवारी पावसाचा जोर वाढणार असून मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याला थेट ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
मराठवाड्यात हवामानात संमिश्र बदल दिसत आहेत. हिंगोली आणि परभणीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. राज्याच्या उर्वरित भागात मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.
राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा स्पष्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे (घाटमाथा) परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने थेट 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. पालघर, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावू शकतील.
नाशिक शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने नाशिकसाठी पुढील तीन दिवसांचा पावसाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे.