मुंबई : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी गारगाई धरण प्रकल्पाला गुरुवारी आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात मंजुरी देण्यात आली. शिवसेना ठाकरे गट समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या मागणीवर ठाम असून त्यांनी गारगाई प्रकल्प दफ्तरी दाखल करण्याची उपसूचना यावेळी मांडली. मात्र, ती फेटाळून लावत गारगाई प्रकल्प मंजूर करण्यात आला.
गारगाई धरण प्रकल्प पूर्ण होण्यास ६ वर्षाचा कालावधी लागणार असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गारगाई धरण प्रकल्पाला कधी सुरूवात होणार कधी संपणार याबाबत प्रशासनाकडून काहीच स्पष्टता नाही. पाऊस पडला तर धरण भरणार म्हणजे पावसावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प खर्चिक असून समुद्राचे खारे पाणी गोडे करणे हा प्रकल्प दोन वर्षांत होईल आणि दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे गारगाई प्रकल्पाचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात यावा, अशी उपसूचना ठाकरे सेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी गुरुवारी सभागृहात केली.
मुंबईकरांना मुबलक पाणी मिळावे ही सगळ्याच नगरसेवकांची अपेक्षा आहे. कोस्टल रोड प्रकल्पासाठी परवानग्या मिळवल्या, आता गारगाई प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळाली असून केंद्र सरकारची परवानगी लवकर मिळेल, अशी आशा सभागृह नेते गणेश खणकर यांनी व्यक्त केली. अखेर आरोप प्रत्यारोपात फणसे यांची उपसूचना बहुमताने नामंजूर करत गारगाईचा मूळ प्रस्ताव बहुमताने मंजूर केल्याचे महापौर रितू तावडे यांनी जाहीर केले.
समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा प्रकल्प दोन हजार कोटी रुपयांत होणारा आहे. मात्र, गारगाई धरण महागडा प्रकल्प असून पाच लाख झाडे तोडण्यात येणार आहेत. सहा गावांचे पुनर्वसन कुठे करणार काहीच माहिती प्रशासनाने दिलेली नाही. त्यामुळे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प कमी खर्चाचा असून त्याला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी फणसे यांनी यावेळी केली.
२०१५ मध्ये सुरू करण्यात आलेला महत्त्वाकांक्षी गारगाई धरण प्रकल्प विविध कारणांमुळे २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने तात्पुरता थांबवला होता. गारगाई धरण प्रकल्पात विविध प्रकारची एकूण ३ लाखाहून अधिक झाडे बाधित होणार आहेत. तसेच या प्रकल्पात सहा गावही बाधित होत असून त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. २०२० मध्ये या प्रकल्पाची मूळ किंमत ३ हजार १०५ कोटी रुपये असताना आता हीच मूळ किंमत विविध करासहित एकूण ५ हजार ३९६ कोटी रुपयांपर्यत पोहचली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे सांगत विरोधी पक्षाने या प्रकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीतही विरोध दर्शविला होता. त्यानंतरही या प्रकल्पाला सभागृहात मंजुरी मिळाली.
सभागृहात शाब्दिक चकमक
भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांनी हा प्रस्ताव शिवसेना काळात आला. महाविकास आघाडी काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळीच या प्रकल्पाला विलंब झाला. त्यांनीच स्थगिती दिल्याचे सांगितल्याने विरोधकांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी गारगाई प्रकल्प गरजेचा असल्याचे सांगून त्याला विरोध का, असा सवाल केला. शिवसेना उबाठाच्या ज्येष्ठ नगरसेविका विशाखा राऊत यांनी, पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या या प्रकल्पात तीन लाख झाडे लावणार असे सांगत आहात, तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक कोटी झाडे कुठे लावली हे सांगा, असा सवाल केला.